हरतालिकाव्रताच्या दिवशी सर्व स्त्रियांनी उजव्या हातात पाणी घेऊन पुढील संकल्प करून मगच हरितालिका पूजेस आरंभ करावा-
ॐ विष्णुः विष्णुः विष्णुः
ॐ तत्सदद्य श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया
प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीयेपरार्द्धे श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बुद्वीपे भारतवर्षे भरतखंडे आर्यावर्ते दंडकारण्ये पुण्यक्षेत्रे कलियुगे कलिप्रथमचरणे विलंबी नामसंवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्ल पक्षे तृतीयायां तिथौ गुरु वासरे
चित्रा नक्षत्रे ब्रह्मा योगे
गरज करणे
कन्या राशीस्थितेचंद्रे
सिंह राशीस्थिते सूर्ये
तुला राशीस्थिते देवगुरौ
शेषेषु ग्रहेषु यथायथं राशीस्थान स्थितेषु
अमुक [ आपले गोत्र ] गोत्रायाः अमुक [ आपले नाव ] नाम्नि अहं
ममसमस्तपापक्षयपूर्वकं सप्तजन्मसु राज्यसौभाग्यादि सिद्धये उमामहेश्वरसायुज्य सिद्धयर्थं च हरितालिकाव्रतं करिष्ये।
=======================================================
व्रत कथा
======
गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात.
हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा पती मिळावी म्हणून “हरतालिका` हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.
हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव “पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, “हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. “तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.`
पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला “अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने “तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.
तिचा दृढनिश्चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला “पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.
इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्चर्येने मिळविला.
=============================================================
हरतालिका पूजेचे साहित्य
===================
पत्री
( पत्रपूजेतील क्रमानुसार ) – बेल , आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ , अशोक .( उपलब्धीप्रमाणे )
सौभाग्यवायनसाहित्य
परडीत / पत्रावळीवर – हळदकुंकू , तांदूळ , वस्त्र , पानसुपारी , नाणे , नारळ , गजरा / वेणी , शिधा तसेच ; फणी , काजळ , गळेसरी , कांकणे , आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये .
गृह्यसाहित्य
अत्तरफाया , हळदकुंकू , चंदनगंध , अष्टगंध , गुलाल , बुक्का , अक्षता , रांगोळी , उदबत्ती , कापूर , आगपेटी , सुटीनाणी ६ , तुपाच्या व तेलाच्या वाती , कापसाची मालावस्त्रे – १६ मण्यांचे १ व ५ मण्यांचे १ , तांदूळ ( वाटीभर ) पंचामृत ( दूध , दही , तूप , मध , साखर ) गूळखोबरे , नैवेद्य , सुंठवडा ( डिंकवडा ), चौरंग / पाट , आसन , पाण्याचा कलश , शंख , घंटा , समई , नीराजने , कापूरारती , पळीपंचपात्र , ताम्हण , देव पुसण्याचे वस्त्र , हातपुसणे , तसराळे , पेलाभर उष्णोदक .
व्रतोद्देश
कुमारीना सुयोग्य वरप्राप्ती , सुवासिनींना अखंडसौभाग्यप्राप्ती .
पूजार्ह देवता
पार्वती व हरताली : ( मृत्तिकेच्या मूर्ती व वाळूचे शिवलिंग )
पूजाकाल :भाद्रपद शुद्ध तृतीयेस प्रथम प्रहरात ही पूजा करावी
व्रताचार : ही पूजा अविवाहित व विवाहित अशा सर्वच स्त्रिया करतात . ह्या दिवशी उपवास करावा . रात्रौ यथाशक्ति जागरण करून देवीची आरती करावी .
Leave a Reply