जय मल्हार……

दिनांक  ६ डिसेंबर २०२४ रोजी शुक्रवारी चंपाषष्ठी हा सण आहे 

आज चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस . आज मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजयोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. या दिवशी भगवान कार्तिकेयाला चंपा पुष्प अर्पण केले जाते आणि षष्ठीतिथीमुळे या व्रताला चंपा षष्ठी असे नाव देण्यात आले आहे. आजच्या पूजेत वांगी अर्पण करण्याचीही परंपरा आहे, म्हणून या व्रताला वांगी सटी तसेच हिंदी प्रभागात बैगन छठ म्हणतात.

श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात.

जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. कृतयुगात मणी व मल्ल या राक्षसांना ब्रह्म देवाने, “तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही” हा वर दिला त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली.
भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या ७ कोटी (येळकोट) सैन्य घेऊन व कार्तिकेयासह ते मणि आणि मल्ल राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन अखेर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाला त्याची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. मणी राक्षसाने शरण येऊन “माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे” अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.

नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याचे शरण जाऊन “तुमच्या नांवाआधी माझे नांव जोडले जावे अशी मागणी केली.” तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी (मल्ल+अरी) मार्तंड असे म्हणण्यात येते. हा विशेषत: धनगराचा देव मानला जातो. अतिशय जागृत देव आहे. मुख्य भंडारा म्हणून हळद उधळली जाते; ज्वारीचा रोडगा व भरीत हा त्यांचा प्रसाद असतो.

भंडारा
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.

खंडोबाची पांच प्रतिके:
१) लिंग: हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते.
२) तांदळा: हि चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते
.३) मुखवटे: हे कापडी किंवा पिटली असतात.
४) मूर्ती: ह्या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात.
५) टाक: घरांत पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा.

खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे.

काही सौम्य नवस:
१) मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे.
२) दीपमाळा बांधणे.
३) मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे.
४) पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे.
५) देवावर चौरी ढाळणे. खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे.
६) पाण्याच्या कावडी घालणे.
७) उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणविणे. यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात.
८) देवाची गदा म्हणजे वारी मागणे. (देवाच्या नावाने ठराविक काळांत भिक्षा मागणे.)
९) तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे.
१०) पुरण-वरण व रोडग्याचा आठवा रीतिनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांस भोजन घालणे.
११) कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.

दिन विशेष:
रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने:
महाराष्ट्र:
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी
जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्‍या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्‍या ६३ ओर्‍या आहेत.
२) निमगाव
३) पाली-पेंबर सातारा
४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद)
५) शेंगुड (अहमदनगर)
६) सातारे (औरंगाबाद)
७) माळेगाव

कर्नाटक:
१) मैलारपूर-पेंबर (बिदर)
२) मंगसूल्ली (बेळगाव)
३) मैलारलिंग (धारवाड)
४) देवरगुडू (धारवाड)
५) मण्मैलार (बल्ळारी).

खंडोबाचे नवरात्र:
खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात. खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत, मार्तंडभैरव, किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचावध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले. हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले.

खंडोबाची वेशभुषा:
साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेष असतो.

प्रमुख भक्ती:
बेल-भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ति होय. हळदपूड, सुक्या खोबर्‍याच्या वाट्या एकत्र करुन तो प्रसाद व
” येळकोट येळकोट जय मल्हार ” हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात, की ‘हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल.

खंडोबाच्या हातातील वस्तु:
खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो. मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो.

खंडोबाची उपासना:
खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा-संमार्जन करावे. नंतर नवरात्र बसविणार्‍याने स्नान करुन शुचिर्भूत व्हावे.

खंडोबाची पूजा:
खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते.

देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी.
कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे.
पूजा करताना फुले, गुलाल, व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत.
पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत.

पत्री:
पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी.

देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर वाटींत दूध ठेवावे. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा.
देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.

देवाजवळ नंदादीप
सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात. सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.

महानैवेद्य:
सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात.
खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो.

चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ‘ वारी खंडोबाची ‘ म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.

तळी भरणे
तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात देवाचे टाक, विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण “सदानंदाचा येळकोट” किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. तळी भरण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त लोक हात लावत असतात. त्यानंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.

तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन “सदानंदाचा येळकोट” किंवा “एळकोट एळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.

तळी भरतेवेळी ही आरती म्हणावी

बोल खंडेराव महाराज की जय ॥ सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार ॥ हर हर महादेव ॥

चिंतामण मोरया ॥ भैरोबाचा चांदोबा ॥
अगडबंब नगारा ॥ सोन्याची जेजुरी ॥
मोत्याचा तुरा ॥ निळा घोडा ॥
पाई तोडा ॥ कमरी करगोटा ॥
बेंबी हिरा ॥ गळयात कंठी ॥
मोहन माळा ॥ अंगावर शाल ॥
सदा हिलाल ॥ जेजुरी जाई ॥
शिकार खेळी ॥ म्हाळसा सुंदरी ॥
आरती करी ॥ देवा ओवाळी ॥ नाना परी ॥
देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा ॥
खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका ॥

बोला सदानंदाचा येळकोट ॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥

वारी मागणे-
काही घरांतून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. वारीचा अजुनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यांत वारी मागतात. ताम्हण घेऊन पाच घरी ‘ वारी खंडोबाची ‘ म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारींत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्न-धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे.

दान-धर्म:
या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान-धर्म करावा. अन्नदानास फार महत्व आहे. कुंकू-अक्षतांसह पान-विडा द्यावा.

दिवटी-बुधले:
दिवटी- बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधांत शांत (विझवावी.) करावी.
व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे.

लग्नकार्यांत अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे. याही प्रचलीत प्रथा आहेत.

आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे.

 

सगळे मिळून श्री खंडेरायाला प्रार्थना करुया

जय खंडोबा जय म्हाळसादेवी | सैदव आम्हांसी सुखी ठेवी | योगक्षेमाची चिंता नसावी | विजय व्हावा सर्वत्र || ९२ ||
पत्नी सुना कन्या पुत्र | कुटुंबपरिवार आणि पौत्र | बंधुभगिनी आप्त मित्र | सुखी असोत सर्वही || ९३ ||
नोकरचाकर गुरेंढोरें | विद्या वैभव मिलो सारें | वाहनसौख्यही लाभों खरें | शत्रु कोणी नसावा || ९४ ||
दुरित अवघें व्हावें दूर | ज्ञानसूर्य जावो अज्ञानतिमिर | धनधान्य मिलो अपार | हीच पायी प्रार्थना

|| ॐ नमो मार्तण्ड भैरावय नमः ||

सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट

येळकोट येळकोट जय मल्हार

श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा…….

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।

मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥

नानापरिची रचना रचिली अपार ।

तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥

जय देव जय देव शिवमार्तंडा ।

अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥

मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।

त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥

नाटोपे कोणास वरे मातला ।

देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।

मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।

चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी ।

अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥

मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।

देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥

अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।

देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥

येळकोट येळकोट जय मल्हार…..
सदानंदाचा उदोउदो….

=====================

एकदा श्रीसमर्थ रामदास स्वामी पुरंदर किल्ल्यावरून चाफळला जाताना जेजुरी वरून चालले होते. तेवढ्यात एक धनगर, घोड्यावरुन समर्थांसमोर आला. त्याने समर्थांचे दर्शन घेतले व म्हणाले, “महाराज खंडोबाच दर्शन घेवून जाना.” तेव्हा समर्थ हसून म्हणाले, “अरे बाबा, मी रामाचा सेवक आहे. मी रामा व्यतिरिक्त इतरांना राम स्वरूपातच पाहतो. तुझ्या खंडोबाला इथूनच नमस्कार करतो. आता गड चढायला मला जमणार नाही.”

त्यावर तो धनगर म्हणाला, “अहो महाराज, तुमच्या रामाने प्रत्येक वेळी शिवलिंग स्थापून शिवाची मनोभावे पूजा केली त्या रामाच्या दैवताला तुम्ही दर्शन घेणार नाही म्हणता, हे जरा अचंबित करणारे आहे”. हे त्या धनगराच्या मुखातील शब्द ऐकून समर्थ चमकले. मनात विचार केला, ही माझ्या रामाची आज्ञा दिसत आहे. हे पाहून नाईलाजाने धनगराच्या घोड्यावर बसून वर जेजुरी गडावर आले. त्यावर धनगर म्हणाला, “महाराज, तुम्ही दर्शन घ्या. मी घोड बांधून येतो.”

समर्थ मंदिरात गेले तिथे खंडोबाचे लिंग पाहून महाराजांचे मन प्रसन्न झाले. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. अंगाला कंप सुटला. वाणी सद्गदित झाली आणि त्यांच्या मुखातून शब्द निघाले,

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥

मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥

सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।
नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥

अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥

रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ॥

यालागीं आवडे भाव वर्णीला ।
रामी रामदासा जिवलग भेटला ॥

म्हणजे, श्री रामाचा भक्त असून रामाचे नाव घेत असताना माझ्या हृदयात प्रत्यक्ष शंकर अवतरले. ही अनुभूती समर्थांना आली. दर्शन घेऊन बाहेर येतात तर, तो घोडा ही नाही आणि तो धनगर ही नाही.

समर्थांनी ओळखले की प्रत्यक्ष श्री खंडोबा समर्थांना गडावर घेऊन आले होते. मी देवाला कष्ट दिले याचे समर्थांना फार वाईट वाटले.

हीच खंडोबाची आरती सर्व महाराष्ट्रभर प्रचलित आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

==================================

श्रीमल्लारिकवचम्

 

मल्हारिकवचम्

श्रीगणेशाय नमः ।

अस्य श्रीमल्लारिकवचमन्त्रस्य स्कन्दऋषिः ।

अनुष्ठुप्छन्दः । श्रीमल्लारिदेवता ।

श्रीमल्लारिकवचजपे विनियोगः ॥

 

अथ ध्यानम् ।

ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरीनिभं म्हालसाभूषिताङ्कं

श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणैस्सेव्यमानं कृतार्थे ।

युक्ताङ्घ्रि दैत्यमूर्घ्नी डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं

नित्यंभक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृतं नित्यमोंकाररूपम् ॥

 

अथ कवचम् ।

सनत्कुमार उवाच ।

मुनीनां सप्तकोटीनां वरदं भक्तवत्सलम् ।

दुष्टमर्दनदेवेशं वन्देऽहं म्हालसापतिम् ॥ १॥

 

अनुग्रहाय देवानां मणिरत्नगिरी स्थितम् ।

प्रसन्नवदनं नित्यं वन्देऽहं मल्लवैरिणम् ॥ २॥

 

सर्वदेवमयं शान्तं कौमारं करुणाकरम् ।

आदिरुद्रं महारुद्रं वन्देऽहं सात्विकप्रियम् ॥ ३॥

 

भुक्तिमुक्तिप्रदं देवं सर्वाभरणभूषितम् ।

कोटिसूर्यप्रतीकाशं वन्देऽहमसुरान्तकम् ॥ ४॥

 

आदिदेवं महादेवं मल्लारिपरमेश्वरम् ।

वीरसत्त्वं विरूपाक्षं वन्देऽहं भक्तवत्सलम् ॥ ५॥

 

भोगरूपपरंज्योतिः शिरोमालाविभूषितम् ।

त्रिशूलादिधरं देवं वन्देऽहं लोकरक्षकम् ॥ ६॥

 

इदं पठति यो भक्त्या मल्लारिप्रीतिकारकम् ।

भक्तानां वरदं नित्यं प्रणतोऽस्मि महेश्वरम् ॥ ७॥

 

फलश्रुतिः –

वने रणे महादुर्गे राजचोरभयोऽप्लुते ।

शाकिनीडाकिनीभूतपिशाचोरगराक्षसाः ।

ग्रहपीडासु रोगेषु विषसर्पभयेषु च ॥ ८॥

 

सदा मल्लारिमल्लारिमल्लारिरिति कीर्तनम् ।

सप्तजन्मकृतं पापं तत्क्षणादेव नश्यति ॥ ९॥

 

त्रिकाले तु पठेन्नित्यं विष्णुलोकं स गच्छती ।

देहान्ते तु तं प्राप्नोती सर्वलोके महीयते ॥ १०॥

 

इति श्रीब्रह्माण्डपुराणे क्षेत्रखण्डे मल्लारिमाहात्म्ये

श्रीमल्हारिकवचं सम्पूर्णम् ।

 

संदर्भ : वेब दुनिया, के व्ही बेलसरे आध्यात्मिक साहित्य फेसबुक ग्रुप, गणेश चासकर फेसबुक, इंटरनेट वरील इतर साहित्य

 

Leave a Reply

Your email address will not be published.