महालक्ष्मी महात्म्य : मार्गशीर्ष गुरुवार व्रत Mandar Sant December 17, 2020 Uncategorized, दिनविशेष *॥ श्री महालक्ष्मी माहात्म्य ॥* नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥ नमस्त् गरुडारुढे कोलासुर भयंकरि । कुमारि वैष्णवि ब्राह्मि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥ प्रथम वंदितो श्रीगजाननाशी । जो नाशी विघ्नराशी । सद्भावे त्याच्या चरणांशी । कृपा भाकितो । ग्रंथ सिद्ध्यर्थ ॥१॥ कार्यारंभी गणेशाचे पूजन स्मरण । विघ्नांचे होई हरण । आणि कार्यसिद्धी जाण । होत असे निश्चये ॥२॥ माझिये अंतरी वसावे । सर्वकाळ वास्तव्य करावे । मज वाकशून्यास वदवावे । कृपाकटाक्षे ॥३॥ आता नमन माझे श्रीशारदेशी ।जी सर्व विद्यांची स्वामिनी । ब्रह्मादिकांची जननी । प्रणवरूपिणी जगन्माता ॥४॥ श्रीव्यास वाल्मिक तुकाराम । श्रीज्ञानेश्वर भगवंताचे अवतर । ज्यांचे अवतार कार्य थोर । त्यांसि नमितो अत्यादरे ॥५॥ स्वामी समर्थ दत्तावतार । भक्तकार्यार्थ झाला भूवर । त्यांचे स्मरण करता वरचेवर । भक्तोद्धार होतसे ॥६॥ माझे साष्टांग नमन त्यांचे चरणी । कृपा करोनी चालावी लेखणी । ऐशी करितो विनवणी । लक्ष्मी माहात्म्य वर्णावया ॥७॥ आता महात्म्य वर्णावयास । शरण तिच्या चरणास । वंदितो स्फूर्ति देण्यास । माहात्म्य गावे म्हणून ॥८॥ जय जय जगज्जननी । तू भवभयहरिणी । भक्तांसी संकट तारिणी । तुज वंदितो मनोभावे ॥९॥ अनेक अवतार धरून । तू केलेस भक्त पालन । आणि दुष्टांचे संहरण । म्हणून सुखनिधान आम्हासी ॥१०॥ तू सकळ जगाची माता । चराचरावर तुझी सत्ता । भक्तांवरी माया सर्वथा । आम्हालागी प्रसन्न हो ॥११॥ तू अनंत । तुझी नामे अनंत । त्यातून आठवून काही एक । प्रार्थना तुजसी करतसे ॥१२॥ लक्ष्मी लज्जे महाविद्ये । श्रद्धे पुष्टि स्वधे ध्रुवे । महारात्री महामाये । नारायणि नमोस्तुते ॥१३॥ मेधे सरस्वती वरे । भूति बाभ्रवि तामसी । नियते त्वं प्रसीदेशे । नारायणि नमोस्तुते ॥१४॥ पूर्वी मार्कण्डेय मुनींनी । शिष्यांस जी कथन केली । सुतांनी शौनकास कथिली । तीच अनुवादिली कथा येथं ॥१५॥ महालक्ष्मीचे महात्म्य । पुण्यफलद प्दमपुराणात वर्णन । केले आहे आवर्जुन । सारांश त्याचा हा असे ॥१६॥ पूर्वी द्वापारयुगा माझारी । पवित्र सौराष्ट्र भूमिवरी । जे कथा घडली अवनीवरी । तीच आता श्रवण करी ॥१७॥ त्या सौराष्ट्र राज्यावरी । राजा भद्रश्रवा राज्य करी । शूर वीर कीर्तिमंत । समुद्र स्वामी तो होता ॥१८॥ त्यासी वेदांचे ज्ञान होते । प्रजाहितात लक्ष होते । संत ब्राह्मण संतोषते । केले त्याने ॥१९॥ त्याची पत्नी सुरतचंद्रिका । लाखात सुलक्षणी हो का । अष्टपुत्रा पतिव्रता वैभवी नांदतसे ॥२०॥ राणीस होते पुत्र सात । वरी कन्या एक । शामबाला नामक । अत्यंत भाविक ती ॥२१॥ एकदा काय झाले । महालक्ष्मीच्या मनात आले । तिच्या राज्यात जावे । आठवण आहे का पहावे । पूर्वजन्मीची ॥२२॥ राजवैभव वाढवावे । प्रजेत ते पोहोचवावे । म्हणून राजास द्यावे । कृपादान ॥२३॥ गरिबावर करितां कृपा । तोच खाईल एकटा । इतरेजनांस वाटा । कैसा मिळे ॥२४॥ म्हणोनि लक्ष्मीने काय केले । आपले रूप पालटले । म्हातारीचे रूप घेतले । चाले काठी टेकित ॥२५॥ दीनपणे राजद्वारी पोचली । तोच एक दासी आली । कोणास भेटाण्या आली । विचारी तीस ॥२६॥ काय तुझे नाव आहे । कोण तुझे पती असती । कोण्या गावे करिसी वसती । काम काय आहे ॥२७॥ वृद्धा म्हणे माझे नाव कमला । भुवनेश पति मजला । द्वारकेत असते वस्तीला । राणीस भेटणे असे ॥२८॥ तुझ्या राणीस ओळखते । लक्ष्मीकृपे वैभव भोगते । काय लक्ष्मीस स्मरते । पहाण्यास आले मी ॥२९॥ राणी रमली महालात । मैत्रिणीच्या समवेत । आपुल्या निरोपे येईल क्रोधात । जाय परतोनी म्हणे दासी ॥३०॥ वृद्धा म्हणे दासीला । ऐक तिच्या पूर्ववृत्ता । दारिद्र्य जावोनी ऐश्वर्यमत्ता । कैशी आली ॥३१॥ राणीला गर्व झाला दिसे । श्रीमंतीने लाविते पिसे । गरिबा भेटण्या न दिसे । एकही पळ ॥३२॥ धुंदी चढली वैभवाची । उतरली पाहिजे साची । हीच प्रजाकल्याणाची । वाट दिसे ॥३३॥ पूर्वजन्मीचे विसरली । लक्ष्मीने कृपा केली । दारिद्रयातून वर आली । राजवैभव भोगिते ॥३४॥ पूर्वजन्मीची वैश्य पत्नी । दारिद्रये गेली गांजोनी । पतिपत्नी नित्य भांडोनी । संसारसुखा आंचवले ॥३५॥ पती मारहाण करी । नित्य संतापे भाष्य करी । पत्नी मनी विचार करी । धन जवळ करावे ॥३६॥ घर सोडोनि जाण । गेली वनात निघोन । तेथे कष्ट दशा दारूण । वणवण फिरता भोगितसे ॥३७॥ कंटक रूतती पायात । अश्रू दाटती नेत्रात । घास नसे पोटात । ब्रह्मांड आठवे ॥३८॥ बसली एका दगडावर । रूदन करी अपार । नेत्री संतत धार । अश्रूंची होती ॥३९॥ लक्ष्मी देवीस करूणा आली । तेथ्ं ती प्रगटली । धीर देऊन वदली । चिंता न करी बाळे ॥४०॥ तिला लक्ष्मीव्रत सांगितले । सुखसंपत्ति आशिर्वाद दिले । कळवळ्याने वाचविले । तिजला ॥४१॥ मार्गशीर्ष महिन्यात । प्रति गुरुवारी अखंडित । निष्ठा ठेऊन मनात । व्रत अन् उद्यापन केले तिने ॥४२॥ त्या व्रताच्या प्रभावाने । लक्ष्मी मातेच्या कृपेने । वैश्यगृह विपुल धनाने । गेले भरून ॥४३॥ दैन्य दु:खे पळाली । भांडणे ती संपली । सुखे उभी राहिली । पुढे हात जोडोनी ॥४४॥ मग लक्ष्मीचे व्रताचरण । अखंड केले धारण । वर्षानुवर्षे पालन । मनोभावे करीतसे ॥४५॥ आयुर्मर्यादा संपता । ते गेले लक्ष्मीलोका । जितुके वर्षे आचरिले व्रता । तितकी सहस्त्र वर्षे सुखे । राहिले तेथे ॥४६॥ त्या पुण्ये पुढले जन्मी । वैश्यपत्नी झाली राणि । वैभव विलास भोगुनि । अहंकार प्रवर्तला ॥४७॥ उतली आणि मातली । घेतला वसा विसरली । आठवण देण्यास तिला भली । येणे हे जाहले असे ॥४८॥ असो कर्म गती गहन । तिला व्रताचे विस्मरण । बोलण्यास तिला नाही क्षण । मी जाते ॥४९॥ दासी म्हणे आजीबाई थांबा । मलाही लक्ष्मीव्रत सांगा । मी ही करेन मले सांगा । दारिद्रय दु:खे पिडले मी ॥५०॥ उतशील आणि मातशील । घेतला वसा टाकशील । धनसंपदा येता वर्तशील । अहंकारे ॥५१॥ तसे होणार नाही । शब्दाला जागेन मी । श्रद्धापूर्वक नमते मी । माते कथी आता ॥५२॥ लक्ष्मी वृद्धारूप नारी । वचने प्रसन्न दासीवरी । व्रताची महती सारी । कथन करी संक्षेपे ॥५३॥ मासा माजी मार्गशीर्ष । त्यास असे ईश्वरी अंश । सुयोग्य लक्ष्मी व्रतास । श्रेष्ठ सर्वि मानला ॥५४॥ मार्गशीर्षी प्रथम गुरूवार । आरंभ करावे व्रत हे थोर । प्रत्येक गुरूवारी महिनाभर । नेमे पूजा करावी ॥५५॥ पहाटे करावे स्नान । निर्मळ असावे तनमन । जागा गोमये सारवून । पाट वा चौरंग मांडावा ॥५६॥ फरशी असता नको सारवण । घ्यावे फडक्याने पुसुन । मग चौरंग ठेऊन । त्यावरी धान्यराशी ठेवावी ॥५७॥ गहू अथवा तांदूळ । रास असावे वर्तुळ । त्यावर ठेवावा कलश । आत जल असावे ॥५८॥ त्यामाजी पैसा सुपारी । दूर्वा तैशा त्यात घाली । हळदकुंकू बोटे ओढावी । आठदिशांनी कलशावर ॥५९॥ पंचवृक्षाचे डहाळे घ्यावे । सर्व बाजूंनी कलशात रचावे । रंगवल्लीने करावे । सुशोभन ॥६०॥ चौरंगावरी देठाची दोन पाने । त्यावर सुपारी नि नाणे । शेजारी मूठभर तांदूळदाणे । त्यावर सुपारी गणपती । स्थापावा ॥६१॥ देवीचे चित्र साजिरे । कलशाजवळ ठेवावे । तैसेच लक्ष्मीयंत्रहि असावे । त्याजवळी ॥६२॥ धातूची मूर्ति असल्यावर । चित्राची नाही जरुर । पूजेस आता सत्वर । लागावे ।६३॥ समई नीरांजन उदबत्ती । प्रज्वलित करावी । वडील माणसे नमस्कारावी । पूजेपूर्वी ॥६४॥ प्रथम आचमन करावे । विड्यावर पाणी सोडावे । श्रीगणपतीस पूजावे । निर्विघ्नतेसाठी ॥६५॥ मग फुले तुळशी घेऊन । त्याने जलसिंचन करून । लक्ष्मीदेवी पूजावी ॥६६॥ मूर्ति असल्या पूजेत । स्नान घालावे ताम्हनात । मग पुसोनि त्वरित । चौरंगावरी ठेवावी ॥६७॥ हळदकुंकु आदि वाहून । सुगंधी पुष्पे अर्पून । धूप नीरांजन ओवाळून । फलनैवेद्य दाखवावा ॥६८॥ सकर्पूर तांबूल अर्पावा । मनींच्या इच्छा पुरविण्यास । देवीस विनवावे ॥६९॥ बसोनि पाटावर सत्वर । व्रतकथा वाचावी सुम्दर । त्यावर माहात्म्य पोथी मनोहर । दूध फळे नैवेद्य अर्पावा ॥७०॥ मग वाचावे महालक्ष्म्यष्टक । सर्वसिद्धीदायक । पूर्णपणे वरदायक । भक्तांसी ॥७१॥ मग नीरांजन उजळावे । उदबत्ती कर्पूर लावावे । आरतीसी करावे । मनोभावे ॥७२॥ आरती झाल्यावरी । मनोभावे प्रार्थना करावी । माते मान्य करी । यथाशक्ति पूजा ही ॥७३॥ काही चूक असल्यास । माते घेई पदरात । निष्ठाभाव आहे मनात । हे जाणुनि ॥७४॥ आमुचे घरी अखंड रहावे । दारिद्रय दु:ख निवारावे । संततिसंपत्तीने भरावे । घर आमुचे ॥७५॥ सुखशांती असावी । तुझे नामी मती रहावी । चित्ती कृतज्ञता रहावी । सदोदित ॥७६॥ मनोभावे करिता प्रार्थना । आईस येते करूणा । ठेवावे मनी वचना । आणि प्रार्थावे ॥७७॥ दिवसा उपवास करावा । दुग्ध फलाहार घ्यावा । रात्री मिष्टान्न नैवेद्य दाखवावा । आरतीचे वेळी ॥७८॥ गोग्रास नैवेद्य काढावा । तो गाईस घालावा । आपुल्या सोईने ॥७९॥ सुवासिनी ब्राह्मण । उद्यापनी भोजन । दक्षिणा दून । संतुष्ट करावे ॥८०॥ त्यानंतर आपण । घेऊन प्रसादाचे पान । करावे प्रसाद भोजन । नामपूर्वक ॥८१॥ दुसरे दिवशी स्नानोत्तर । घेऊनि दूध साखर । नैवेद्यानंतर । पूजा विसर्जन करावि ॥८२॥ कलशातील जल सर्व । तुळशीत करावे विसर्जन । पाच पर्णफांद्या । घेऊन निघावे ॥८३॥ त्या ठेवाव्या पाच ठिकाणी । आणि यावे पूजास्थानी । हळदकुंकू अक्षता दोनदा वाहुनी । नमस्कार करावा ॥८४॥ मार्गशीर्षातील सर्व गुरूवारी । पूजन ऐसे करी । शेवटच्या गुरूवारी । उद्यापन करावे ॥८५॥ उद्यापनाचे दिवशी । पूजा आरती करोनी । सात कुमारी अथवा सुवासिनी । ह्यांसी पाचारावे ॥८६॥ त्यांना आसन द्यावे । हळदकुंकू लावावे । महालक्ष्मी म्हणोनि नमस्कारावे । एकेक फळ नि हे माहात्म्य देऊनि ॥८७॥ वृद्धा एवढे बोलून । वेगे निघाली जाण । दासी म्हणे आई एक क्षण थांब । निरोप देते राणीस ॥८८॥ निरोप मिळता राणीला । क्रोध अनिवार झाला । येऊन म्हणे तू कोण थेरडे । आली कशास इकडे ॥८९॥ वृद्धा म्हणे माजलीस । उन्मत्तपणे वागलीस । पूर्वस्थिती आठव ॥९०॥ आजच्या शुभदिनी । करुन एका स्त्रीची हेटाळणी । विपत्ति घेतलीस ओढवूनि । भोगावे लागेल ॥९१॥ शापवाणी ऐकून । राणी गेली संतापून । आणि धक़्काबुक़्की करून । वृद्धेस तिने अवमानिले ॥९२॥ महालक्ष्मी वेगे निघाली जाण । शामबाला तो समोरून । येती झाली जाण । दैव भले म्हणून ॥९३॥ ती गेली होती उद्यानात । मैत्रिणींच्या समवेत । त्याच वेळी राजमहालात । घटना ही घडली असे ॥९४॥ शामबालेने वंदन करून । आपली दिली ओळख करून । मग वृद्धेने घडले वर्तमान । कथन केले तिजसी ॥९५॥ शामबाला दु:खी झाली । तिने विनये क्षमा याचिली । कारूण्ये माय हेलावली । म्हणे तुझे कल्याण होईल ॥९६॥ सुखसंपन्नता यावी । वैभव कीर्ति लाभावी । विनयशील संतती व्हावी । म्हणून त्वां व्रत हे करावे ॥९७॥ महालक्ष्मीने तिजसी । सांगितले ह्या व्रतासी । आणि म्हटले सुखशांति । कुटुंबी नांदेल ॥९८॥ संकल्प सिद्धिस जातील । समृद्धी भाग्य येतील । पद्मावतीच्या कृपेने जाण । संपूर्ण कल्याण होईल ॥९९॥ मार्गशीर्ष महिन्यातला । तोच होता गुरूवार पहिला । शामबाला करून उपवासाला । पूजन करीत त्या दिनी ॥१००॥ शेवटचे गुरूवारी । ती उद्यापन करी । प्रसन्न झाली महालक्ष्मी । तिजवरी ॥१०१॥ इच्छा मनातली सारी । पूर्ण झाली लवकरी । लक्ष्मी प्रभावास नाही सरी । हेच खरे ॥१०२॥ कीर्तिमंत राजा सिद्धेश्वर । त्याचा सुपूत्र मालाधर । शामबालेस अनुरूप वर । विवाह मंगल जाहला ॥१०३॥ लक्ष्मीचा वरदहस्त लाभला । राजैश्वर्यात शामबाला । परि न सोडले नम्रतेला । भाग्यवान खरीच ती ॥१०४॥ महालक्ष्मीच्या अवकृपेने । भद्रश्रवाचे राज्य गेले । ऐश्वर्य सारे नष्ट झाले । दारिद्री झाले गोघेही ॥१०५॥ आधी दशा । मग अवदशी । नंतर अन्नानदशा । झाली त्यांचि ॥१०६॥ सुरतचंद्रिका मग पतीस । म्हणे जाऊन भेटावे शामबालेस । सांगावे आपुला दुर्दशेस । समजावूनी ॥१०७॥ जावई आपुला धनवान । राखाया आपुला मान । धनसहाय्य देईल महान । संकट टळण्या ॥१०८॥ भद्रश्रवा जरी स्वाभिमानी । तरी परिस्थिती जाणॊनी । जावयाचे राज्यालगोनी । प्रयाण करिता जाहला ॥१०९॥ तळ्याकाठीं राजा बसला । तो होता थकलेला । विश्रांतिसाठी टेकला । तो दासी आल्या काही पाणी नेण्यास ॥११०॥ राजाकडे दृष्टी गेली । विनये चौकशी केली । राजाची ओळख पटली । भेटण्यास स्वारी आली । शामबालेस ॥१११॥ दासी गेली लगबगीने । शामबालेस कथन केले । पिताश्रीचे आगमन झाले । आपुल्या राज्यात ॥११२॥ अत्यादरे वडीलांस । शामबालेने राजमहालास । आणून गौरविले । वस्त्रालंकारे ॥११३॥ अल्पकाळ तेथे राहून । आपली व्यथा कथन करून । तिचे वैभव पाहून । राजा म्हणे निघतो आता ॥११४॥ राजा निघता तेथून । मालाधरे दिला भरून । हंडा सुवर्ण मोहरांनी ॥११५॥ संगे दिले नोकर । मग राजा निघाला सत्वर । चंद्रिकेस भेण्या अधिर । वेगे चाले ॥११६॥ पाहता राणिने राजास । हर्ष झाला मनास । हंडा पाहता उल्हास । मनी दाटे ॥११७॥ राजाने भेट कथन करून । हंडा दाविला उघडून । कौतुके पाहे डोकावून । तो आत काळे कोळसे ॥११८॥ राजा राणी भांबावली । काय लिहिले आहे कपाळी । भद्रश्रवा अश्रू ढाळी । दु:ख नावरे दोघांना ॥११९॥ मुलीविषयी अढी मनात । परंतु जाणे तिच्या राज्यात । मदतीचा मिळेल हात । आशा मोठी ॥१२०॥ म्हणून दु:ख आवरून । राणीने केले गमन । आली तिच्या राज्यालागून । लेकीस भेटावया ॥१२१॥ आली नदीतीरास । पाय उचलेना पुढे जाण्यास । मिटुनी आपल्या नेत्रास बसती झाली ॥१२२॥ एका दासीने देखिले । शामबालेस कथन केले । मातेने थकुनि नेत्र मिटले । बैसलीसे नदीतीरी ॥१२३॥ सत्वरि निघाली घेऊनी रथ । वेगे चाले वाटे लांब पथ । सत्वर उतरून तेथ । वंदिले मातेस ॥१२४॥ बसवून रथात । आणीली राजमहालात । स्नान घालून त्वरित । वस्त्रालंकार दिधले ॥१२५॥ तो होता प्रथम गुरूवार । मार्गशीर्ष महिना खरोखर । मनोभावे मनोहर । पूजा करी शामबाला ॥१२६॥ शामबाला मस्तक लववी । अतिआदरे वंदन करीं । पूर्वजन्मस्थिती जागी करी । सुरतचंद्रिकेस ॥१२७॥ माथा लववी परोपरी । लक्ष्मीव्रत पुन्हा आचरी । राहून लेकीचे घरी । करी उद्यापन ॥१२८॥ लक्ष्मी होता पुन्हा प्रसन्न । स्थिती पालटे परिपूर्ण । आनंदे फुलले मन । लक्ष्मीकृपेने ॥१२९॥ मालाधरास बुद्धि झाली । भद्रश्रवास बोलवावयास भली । तो येताच मसलत शिजली । जिंकणे राज्य पुनरपि ॥१३०॥ मग झाले भीषण । शत्रुसंगे रणकंदन । मग भद्रश्रवास सिंहासन । पुनश्च प्राप्त होय ॥१३१॥ राजधर्म पाळुनि नेटका । भद्रश्रवा जपे प्रजाहिता । प्रजा गौरवे राजसत्ता । दुवा देती ॥१३२॥ राजाचे पुत्रहि सात । परागंदा होते अज्ञात । ते सर्व परत राज्यात । आले लक्ष्मीकृपे ॥१३३॥ शामबालाही भेटण्या आली । राजाराणी मनी धाली । आनंदे ॥१३४॥ परी राणीच्या मनात । किल्मिष एक सलत । हिने संकट कालात । कोळसे दिले ॥१३५॥ म्हणुन राणी नच संभाषी । तरी शामबाला संतोषी । राहिली अल्पमुक़्कामे ॥१३६॥ मग निघता घरी । तोच हंडा मिठाने भरी । घेऊन गेली घरी । आपुल्या समवेत ॥१३७॥ घरी पोहोचल्यावर । प्रश्न करी मालाधर । माहेर-भेट आणली काय् । दाखवी ॥१३८॥ राजसा थांबा थोदे तरी । मग दाखविते सत्वरी । राज्याचे सार खरोखरी । आणले आहे ॥१३९॥ मग सांगे आचाऱ्यास । स्वयंपाक अळणी करण्यास । भोजनी घेता घासास । अन्न बेचव वाटले ॥१४०॥ शामबालेने तरा करून । सर्वा मीठ वाढले पानातून । चवदार लागले सगळे अन्न । म्हणे राज्याचे सार हे ॥१४१॥ मग पतीस म्हणे प्रेमे । मीठ सौराष्ट्राचे सोने । राज्य पित्याचे सागरासम । विशाल ॥ १४२॥ अन्नास चव आणि मीठ । सेवक मिठाशी जागती नित्य । मीठ खाता इमान । जागते प्राणसंकटी ॥१४३॥ राजा डोलवी मान । म्हणे ही इमानाची खूण् । मनी जतन करी जाण । सुनिश्चये ॥१४४॥ राजाराणीस लक्ष्मी पावली । दु:स्थिती दुरावली । वैभवे पुन्हा सरसावली । व्रते लक्ष्मीच्या ॥१४५॥ म्हणू लक्ष्मीदेवीस । सतत स्मरावे रात्रंदिवस । देईल तीच सौख्यास । भावबळे पूजिता ॥१४६॥ हे माहात्म्य जणू कल्पतरू । इच्छित लाभेल वरू । उतरेल पलपारू । व्रत मनोभावे आचरिता ॥१४७॥ देशपांडे नामे कुळात । माधवसुत रंगनाथ । लक्ष्मी माहात्म्य वदत । लोकमङ्गल व्हावया ॥१४८॥ शके अठराशे अठरात । फाल्गुन वद्य पक्षात । लक्ष्मीमाहात्म्य समाप्तीस । रंगपंचमीस आले असे ॥१४९॥ नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥१५०॥ इति श्री महालक्ष्मीव्रत माहात्म्य कथा संपूर्णम् ॥ ॐ नमःशिवाय: श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा) श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान घरात नांदावे; म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ध्यानी घ्यावी, अशी ही कहाणी आहे. द्वापार-युगातली. आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता प्रजादक्ष होता. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकून आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा-राणीने कन्येचे नाव शामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल; प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत-टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, “कोण गं बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय ? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली, “माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेय. कुठे आहे ती? दासी म्हणाली, “राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले, तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब.” म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली. “तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी-तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार्या श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती, समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे.” म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, ” मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही.” म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार, तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, “कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ? जा इथून.” तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार, तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली, “आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते.” राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा-समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव, ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती; ती स्थिती आता बदलली. अन्न-पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे; पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि चार-आठ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून-चालून तो खूप दमला होता; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शामबालालाही ते समजले. शामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला, तेव्हा शामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे, हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय? हंड्यात धन नव्हतेच. होते फक्त कोळसे ! महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्र्श्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करवून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. पण ‘बाप’ भेटायला गेला असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता; पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही,’ हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने शामबालेला विचारले, ” माहेराहून काय आणलंस?” शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले, तर हंड्यात मिठाचे खडे ! मालाधराने चकित होत पत्नीला विचारले, “हे काय? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, “थोडं थांबा, म्हणजे कळेलच.” त्या दिवशी शामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न-पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. “हा मिठाचा उपयोग!’ शामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात, जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील. महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥ ॐ महालक्ष्मी नमः ( अजय जंगम यांच्या सौजन्याने प्राप्त ) Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website