माजी अर्थमंत्री स गो बर्वे पुण्यस्मरण Mandar Sant March 7, 2021 दिनविशेष कुशल प्रशासक ,माजी अर्थ मंत्री कै.स.गो.बर्वे यांचे आज पुण्यस्मरण. (२७ एप्रिल, १९१४:तासगांव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र – ६ मार्च, १९६७:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी सनदी अधिकारी होते. बर्वे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले आणि तेथून ट्रायपॉस म्हणजे बी ए, अर्थशास्त्र आणि आय. सी. एस. या तीनही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३६ साली भारतात परत येऊन अहमदाबादला ते उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले. पुणे महानगर पालिका अस्तित्वात आल्यावर सुरुवातीची तीन वर्षे स.गो.बर्वे पालिकेचे आयुक्त होते. त्याआधी १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी ध्वजारोहण केले होते. पुणे शहरातील ८० फूट रुंदीचा जंगली महाराज रस्ता त्यांच्याच काळात बांधला गेला. हा पुण्यातला पहिला रुंद रस्ता. त्यांनी पुण्याभोवती रिंग रेल्वेची कल्पना मांडली पण मुंबईत आणि दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांनी ती पूर्णत्वास येऊ दिली नाही. राजकीय इच्छाशक्तीअभावी ती पूर्ण झाली नाही. स.गो. बर्वे यांच्या पूर्ण झालेल्या योजनांमध्ये पर्वती आणि हडपसर औद्योगिक वसाहती, संभाजी, पेशवे, शाहू ही उद्याने, संभाजी पूल व धार्मिक स्थळे हलवून कांही रस्ते रुंद करणे इत्यादी कामे झाली. गांधीहत्येच्या वेळी स.गो. बर्वे परदेशात होते. हत्येनंतर पुण्यात सुरू असलेल्या लुटालूट आणि जाळपोळीला आळा घालण्यासाठी ते तातडीने पुण्यात आले आणि त्यांनी संचारबंदी जाहीर केली. रस्त्यांवरून लष्कराची गस्त सुरू झाली आणि काही तासांतच दंगली आटोक्यात आल्या. १९५३ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याचे काम स.गो. बर्व्यांवर सोपवले. नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले. या काळात आंतरराज्य विक्रीकर कायदा, खासगी विमा कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण झाले. पुढे १९५७ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव झाले. या काळात कोयना धरण बांधायला जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्थखात्याचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेला गेले, कोयना धरणासाठी त्यांनी अडीच कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले. प्रशासकीय काम करत असताना बर्व्यांना राज्यसरकारच्या शासन सुधारणा समितीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी काँग्रेसवर सप्रमाण टीका केली. यशवंतराव चव्हाण यांनी ती टीका सकारात्मक रीतीने घेत त्यांना प्रोत्साहन दिले आणि सहकाऱ्यांना सुनावले. बदल घडवण्यासाठी स्वतः राजकारणात जावे असे त्यांना वाटू लागले होते. सकारात्मक बदल घडवायचा असल्याने आणि सत्ताधारी मंडळी रोजच्या संपर्कात असल्याने त्यांनी तत्कालीन काँग्रेसकडून निवडणूक लढवायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला. पण सेवामुक्त होण्याआधीच १२ जुलैला पानशेतची दुर्दैवी घटना घडली. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मदत-पुनर्वसन कार्यासाठी स.गो. बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी समिती नेमली. पुराच्या दुसऱ्या दिवशीपासून अडीच महिने ते कार्यालयातच रहायला गेले, सोबत साताठ कर्मचारीही होते. पहिल्या चार दिवसांत वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत झाले. खडकवासल्याचा मुख्य स्त्रोत बंद झाला आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार हे दिसत होते. मुळशी धरणातून पुण्यात पाणी आणण्याचा महत्वाकांक्षी प्रयोग तीन महिन्यात पूर्ण झाला. दोन आठवड्यात तीन लाख लोकांना प्रतिबंधक लस टोचून झाली. १०० केंद्रात ३६,००० नागरिकांना निवारा मिळाला. पूरस्थिती नियंत्रणात आणतानाच सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ राखत त्यांनी प्रशंसनीय काम केले. त्यामुळे त्याचे हेच काम पुणेकरांच्या अधिक लक्षात राहिले. पुण्याची पुनर्बांधणी करण्याचे अपुरे स्वप्न पुण्याच्या पुनर्वसनाची बर्व्यांची कल्पना भव्य होती. एवीतेवी सर्व वाहून गेलेच आहे तर पु्णे अधिक नियोजनबद्ध रीतीने पुन्हा नव्याने बनवावे असा त्यांचा आग्रह होता. दिल्ली आणि चंदीगडचे नियोजन त्यांच्यासमोर होते. सनदी अधिकारी फक्त सुचवू शकतात. शेवटी अदॊरदृष्टी राजकारण्यांनी ठरवले तसेच झाले. त्यांनी बर्व्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. तत्कालीन परिस्थितीत लवकर होईल ते करायचे ठरले – त्यामुळे पुणे काही फार बदलले नाही. पण जे काही थोडेफार नियोजन झाले ते लोकमान्यनगर – लाल बहादूर शास्त्री रस्ता आणि सहकारनगर येथील पुनर्वसनातून झाले. स.गो. बर्व्यांचा राजकारण प्रवेश यानंतर यशवंतराव चव्हाणांनी स.गो. बर्व्यांना थेट राजकारणात आणले. १९६२ च्या निवडणुकीत शिवाजीनगर – पुणे येथून ते आमदार झाले. आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुद्धा. पुढे वसंतराव नाईक मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. मुंबईचा औद्योगिक बोजा कमी करून जिल्हा स्तरावर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) स्थापण्याची कल्पना त्यांचीच. या कामाचा झपाटा मोठा होता. पुण्याजवळ १०,००० एकर जमीन संपादन करून भोसरी MIDC सुरू झाली. त्यातून दीड लाख रोजगार तयार झाले. ठाण्याची वागळे इस्टेट आणि इतर अनेक औद्योगिक वसाहती, मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्स्प्रेस हायवेज या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. या कामाची दखल घेत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमले. स.गो. बर्वे यांनी सहकार, भारताचे नियोजन आणि आर्थिक धोरण, आणि सुशासानावर इंग्रजीतून ग्रंथलेखनही केले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक मनाचे, विद्वत्तेचा आदर करणारे नेता होते. बर्वे यांच्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाचा वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. १९६७ मध्ये त्यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळचे विद्यमान खासदार व्ही.के.कृष्ण मेनन याना नाकारून काँग्रेसने बर्वे यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या मेनन यांनी अपक्ष लढायचे ठरवले.पण बर्वे खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात उद्योग खाते मिळाले असते तर त्यांनी दूरगामी बदल घडवले असते हे निश्चित. दुर्दैवाने निवडणूक निकालाच्या दिवशीच म्हणजे ६ मार्च १९६७ रोजी निवडणुकीच्या प्रचारातील अतिश्रमाने त्यांचे हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. ही बातमी समजल्यावर ग.दि. माडगूळकर लिहिते झाले, अजुनी कुंकुमतिलक कपाळी, सत्काराच्या गळ्यात माळा । राजमान्यता स्वीकाराच्या भरात आहे अजुन सोहळा ॥ तोच काय हे घडे अचानक, चैतन्याचे होय कलेवर । लक्ष मुखातिल जपनादाचा, होय हुंदका एक अनावर ॥॥(विकिपीडियामधून) Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website