गणेश चतुर्थीस चंद्रदर्शन न करण्याबाबतची श्रीकृष्णाची कथा Mandar Sant August 21, 2020 दिनविशेष 1 एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीनें चंद्राला शाप दिला कीं “आजपासून तुझें कोणी तोंड पाहाणार नाहीं. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल! “शेवटीं चंद्रानें मोठें तप करून श्रीगणपतीला प्रसन्न करून घेतलें. चंद्राच्या तपामुळें व सर्व देवांनीं प्रार्थना केल्यामुळें गणपतीनें चंद्राला शापातून मुक्त केलें. पण वर्षातून एक दिवस “भाद्रपद शुक्ल चतुर्थींच्या दिवशीं म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशीं” तुझें तोंड कोणी पाहाणार नाहीं आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असें सांगितलें. त्यावर चंद्रानें प्रार्थना केली कीं, जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझें तोंड पाहिलें तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्यानें काय करावें? तेव्हां गणपतींनें सांगितलें कीं, त्यानें ‘संकष्ट चतुर्थी व्रत ” करावें, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. गणेशचतुर्थी दिवशी चंद्र पाहिल्यामुळें श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत” केल्यामुळें गेला, अशी कथा आहे, ती खालील प्रमाणे : फार पूर्वी सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु स्त्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारुन तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला. प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय? एके ठिकाणी प्रसेन मरुन पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. हि वार्ता काही दिवसांनी द्वारकेत येऊन पोहोचली . त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात, द्वारकेत सगळीकडे आनंदीआनंद झाला. श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. : पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने अनावधानाने चंद्र पाहिला होता. त्यानंतर त्याचे प्रायश्चित्त घ्यायचे राहिले. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. One Response Sameer September 13, 2018 मस्त Reply Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website