( सर्व संकटांचा नाश करून इच्छित फळ शीघ्र प्राप्त करून देणारे श्रीगणपतीचे व्रत )

संकष्ट चतुर्थीव्रत…प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यांत वद्य चतुर्थीच्या दिवशीं “संकष्ट चतुर्थी” असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करून, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळीं श्रीगणपतीचीं पूजा करून, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचें. अशी या व्रताची थोडक्यांत पाळणूक आहे.

त्यात श्रावण महिनात येणारी वार्षिकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व चतुर्थ्या केल्याचे पुण्य मिळते .  चतुर्थी चे उपवास नेहेमीसाठी सुरू करायचे असतील तर ते श्रावणातील संकष्ट चतुर्थीपासून चालू करतात. अंगारकी चतुर्थीपासून सुरू करणे हा दुसरा पर्याय आहे.

“श्रीसंकष्टहरगणपती” हे या व्रताच्या देवतेचें नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषानें, व्रताला सुरवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशीं करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचें उद्यापन करावें. कांहींजण इच्छा पूर्ण होईपर्यत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणारांनीं उपोषण सोडवण्यापूर्वी नेहमीं, पुढें दिलेलें “संकष्ट चतुर्थी माहात्म्य” अवश्य वाचावें.

संकष्टचतुर्थीचें व्रत करणारानें, त्या दिवशीं पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावीं. दीवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. संध्याकाळीं रात्रौ आवश्यक वाटल्यास आंघोळ करावीं.

नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्यानें भरलेला कलश (तांब्या) ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रें गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यांत “श्रीसंकष्टहरगणपतीचीं” स्थापना करावीं. (श्रीगणपतीची सोने, चांदी, तांबें वगैरे धातूची मूर्ती अगर तसबीर ) त्याची षोडशोपचारे पूजा करावी. पूजा करणारानें अंगावर लाल वस्त्र घ्यावें. पूजेत वाहावयाचें “गंध-अक्षता-फूल-वस्त्र” तांबड्य रंगाचें असावें. पूजेत उपचार अर्पण करतांना,

लंबोदराय नम: म्हणून गंध, कामरूपाय, नम: म्हणून अक्षता,

सिध्दिप्रदाय नम: म्हणून पुष्प, सर्वार्थसिद्धिदाय नम: म्हणून फळ,

शिवप्रियाय नम: म्हणून वस्त्र, गणाधिपाय नम: म्हणून उपवस्त्र,

गजमुखाय नम: म्हणून धूप, मूषकवाहनाय नम: म्हणून दीप,

विप्रनाथाय नम: म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम: म्हणून, दक्षिणा अर्पण करावी.

रक्तांगं रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै: ॥
क्षीराब्धौ रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थमू ॥
दोर्भि: पाशांकुशेष्टा भयधृतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ॥
ध्यायेच्छांत्यर्थमीशं गणपतिममलं श्रीसमेंत प्रसन्नमू ॥

नंतर आपलें संकट निवारण्याची व मनोकामना ( मनांतील इच्छा ) पूर्ण करण्याची प्रार्थना करावी.

मम समस्तविघ्ननिवृत्यर्थ संकष्टहरगणपतीप्रीत्यर्थं चतुर्थेसेव्रतांगत्वेन
यथा मीलितोपचार द्रव्यै: षोडशोपचार पूजां करिष्ये ॥

असें म्हणावें. नंतर पुढें दिलेलें “संकष्ट चतुर्थी माहात्म्य” वाचावें. २१ मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी. आरती झाल्यावर-

अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्यहीनं मया कृतम् ।
तत सर्वं पूर्णतां यातु विप्ररूप गणेश्र्वर ॥

असें म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चंद्रदर्शन करून, चंद्राला अर्ध्य, (पाणी) गंध, अक्षता, फूलें वाहून त्याची पूजा करावी. “रोहिणीनाथाय नमः ” म्हणून नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावें. जेवणांत मोदक असावे, गोड पदार्थ असावेत, खारट व आंबट पदार्थ नसावेत. (चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते.) जेवण झाल्यानंतर उत्तरपूजा करून मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.

—————————-

 आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व *गणेश भक्त* संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति *श्रीगणेशा* ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि *चंद्रोदया* नंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो.

परंतु हीच संकष्टी जेंव्हा *मंगळवारी* येते तेंव्हा हिला *अंगारकी चतुर्थी* म्हणून संबोधिले जाते. ह्या मागची कथाही तितकीच रंजक आहे.

कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी *भरद्वाज* हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते.

ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून *अंकारक* नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं.

त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थी चा.
” स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायाचे वरदान ” त्यानं प्रसन्न झालेल्या *श्रीगणेशा* कडे मागितीले.

यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, “ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच *अंकारीका* ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास *२१ संकष्टी* केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील”.

“अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नांवे तुला ब्रम्हांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील”.

त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेंव्हा पासून ‘अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे *२१संकष्टी* केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे.

म्हणूनच उद्याच्या मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली वहिली *अंगारकी योग* असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्वाचे ईप्सित कामे मार्गी लागण्यासाठी, इच्छुकांनी उद्याची अंगारकी मात्र अवश्य धरावी

आणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणुन, *चंद्रदर्शन* करुनच उपवास सोडावा.
तसेच हेही ध्यानात असु द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरुन दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पध्दत मात्र अवलंबू नये.

कारण मुळातच *बाप्पा* ला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशा नुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करुन उपवास सोडणे केंव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच.

*?गणेश अंगारकी श्लोक?*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
गणेशाय नमस्तुभ्यं, सर्व सिद्धि प्रदायक ।
संकष्ट हरमे देवं, गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥
कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये।
क्षिप्रं प्रसीद देवेश, अंगारकाय नमोऽस्तुते ॥

image35 B-Ganpati

एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीनें चंद्राला शाप दिला कीं “आजपासून तुझें कोणी तोंड पाहाणार नाहीं.

image35D-Ganpati cHANDRA
जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल! “शेवटीं चंद्रानें मोठें तप करून श्रीगणपतीला प्रसन्न करून घेतलें. चंद्राच्या तपामुळें व सर्व देवांनीं प्रार्थना केल्यामुळें गणपतीनें चंद्राला शापातून मुक्त केलें. पण वर्षातून एक दिवस “भाद्रपद शुक्ल चतुर्थींच्या दिवशीं म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशीं” तुझें तोंड कोणी पाहाणार नाहीं आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असें सांगितलें.

त्यावर चंद्रानें प्रार्थना केली कीं, जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझें तोंड पाहिलें तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्यानें काय करावें? तेव्हां गणपतींनें सांगितलें कीं, त्यानें ‘संकष्ट चतुर्थी व्रत ” करावें, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल.

पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. गणेशचतुर्थी दिवशी चंद्र पाहिल्यामुळें श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत” केल्यामुळें गेला, अशी कथा आहे, ती खालील प्रमाणे :

फार पूर्वी सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा.

सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु स्त्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला.

पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारुन तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला.

इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला.

IMAGE 37 B- JAMBUWANT-KRISHNA FIG

प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय? एके ठिकाणी प्रसेन मरुन पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली.

तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली.

गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.

श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात, द्वारकेत सगळीकडे आनंदीआनंद झाला.

IMAGE 37 - Jambavan-offers-his-daughter-Sri-Krishna

श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.

श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली.

—————————————————————————————-AmazonMensEthnic

आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वानीं करावयाचें, हे एक साधें, सोपें पण शीघ्र फलदायीं व्रत आहे. श्रावण महिन्यांतील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायीं व महत्वाची मानतात. प्रत्येकानें निदान वर्षांतून या दोन संकष्ट्या तरी अवश्य कराव्या.

संकष्ट चतुर्थी ( अंगारकी संकष्ट चतुर्थीं ) माहात्म्य :

श्रीगणेशायनमः ॥ जयजयाजी पंचवदना । दावी तव सुताच्या आनना ॥ पाहतांच पुरती मनकामना । भवबंधना तोडीतसे ॥१॥
अंगीं चर्चित सिंदुर । जो कां कॄपेचा सागर । भक्तजनांचे माहेर । जो कां साचार दीनबंधू ॥२॥
मूषकवाहनीं बैसून । हस्तीं त्रिशूळादि धारण । करीत विघ्नांचें छेदन । चरणीं वंदन तयाच्या ॥३॥
जो कां सद्‍गुरु चैतन्यघन । देउनी ज्ञानाचें दर्पण । प्रकाशविलें आत्मज्ञान । केलें समाधान जीवींचें ॥४॥
तयांचे कां न धरावें चरण । कैसी न यावी आठवण । जगन्नाथ भरला परिपूर्ण । हरिलें भान जगताचें ॥५॥
तया चरणीं माझें मस्तक । जो कां त्रैलोक्याचा नायक । जेथें तो एक मी एक । पूज्यपूजक भाव असे ॥६॥
जो यादवकुळीं जन्मोनी स्पष्ट । गोकुळवासी जनांचे कष्ट । हरोनी केलें संतुष्ट । संहारिले दुष्ट कंसादी ॥७॥
जेणें केलें कालियामर्दन । शुद्ध केलें यमुना जीवन । तया कृष्ण चरणी माझें नमन । लागलें ध्यान मनोभावें ॥८॥
तया कृष्णाचें करितां स्मरण । काळ जाय मनीं दडपोन । क्षमा दया शांति येवोन । पावती समाधान ते ठायीं ॥९॥
जैसा उदकावरी तरंग । पाहतां पाहतां पावे भंग । तैसा विन्घांचा प्रसंग । निर्घिन्घ सांग करितसे ॥१०॥
जैसी सागराची लहरी । येत जात एक सरी । तैसीं संकटें नानापरी । येतां निवारी गजवदन ॥११॥
तया गणपतीचें व्रत देख । आधीं तिथिनिर्णय ऐक । जो कां होय सुखदायक । चालती सकळिक जयारीतीं ॥१२॥
श्रावण कृष्णामाझारीं । तृतीयायुक्त चतुर्थी अवधारीं । चंद्रव्यापिनी असेल जरी । तरी व्रतातें करावें ॥१३॥
दोन्ही दिवस चंद्र व्यापिनी तिथी असोनी पूर्व दिनी करिती । मातृविद्धा तयास म्हणती । आहे शास्त्रमत ऐसेची ॥१४॥
दुसर्‍या दिनीं पंचमीयुक्त । चंद्र व्यापिनी चतुर्थी होता । तरी ते न करावी निश्र्चित । ऐसें शास्त्रांत सांगितलें ॥१५॥
तया दिनी काय करावें । पुढें सांगती स्कंद भावे । ते श्रोतेंजनीं ऐकावें । व्रत आचरावें तयापरी ॥१६॥
ऋषी अवघे मिळोन । प्रश्न करिती स्कंदालागुन । दरिद्र शोक कष्ट नाशन । वैरीजन छळिताती ॥१७॥
विद्या कांही नसे जयासीं । पुत्र न होय स्त्रियांसीं । ऐशा दुःखें पीडा जनांसीं । दूर कैशी होय सांगा ॥१८॥
ऐसा ऋषिंचा ऐकोनि प्रश्न । स्कंद पावला समाधान । जनकल्याण व्हावया लागून । तयासी वचन बोलतसे ॥१९॥
सुखप्राप्ति व्हावी सकळिकां । ऐसा उपाय सांगतो ऐका । संकष्टी व्रतें गणनायका । भजतां होय निर्विघ्न ॥२०॥
यथाविधि तया व्रतासी । आचारिता भक्ति भावेंसी । सकळ मनोरथ निश्र्चयेंसी । पूर्ण होतील तत्कालिक ॥२१॥
हें व्रत पूर्वीं श्रीकृष्ण सांगत । संकटापासोनी व्हावया मुक्त । गांजिले जे कां पंडुसुत । तया अद्‍भुत निवेदिलें ॥२२॥
पांडवांसी द्यूतीं जिंकुनी । कौरवें धाडिलें काननीं । तें दुःख न साहे म्हणोनी । सांगे कानीं धर्माच्या ॥२३॥
धर्म, भीमा, अर्जुन नकुळ । सहदेव, द्रौपदी मिळोनी सकळ । व्रत चालविलें अचळ । जेणें तळमळ दूर होय ॥२४॥
द्वादश वर्षें अरण्यवास । पुढें एक वर्ष अज्ञातवास । तेथील हरावें संकटांस । पुन्हा विपिनास न यावें ॥२५॥
हा हेतु धरोनी मनीं । करिते झाले व्रतालागुनी । श्रावण वद्य चतुर्थी दिनीं । आंरभ करोनी चालविलें ॥२६॥
तया व्रते करोनी जाण । त्रयोदशअब्द पूर्ण नसोनी । पुनरपी अरण्य सेवन । गजाननें जाण दूर केलें ॥२७॥
ऐसा व्रताचा महिमा जाण । कृष्णें सांगितला कोठून । तें करावें निवेदन । करविणें श्रवण आम्हा आधी ॥२८॥
मग ऋषींचा प्रश्र्न ऐकोन । स्कंद सांगती तयालागुन । पार्वतीस हेरंब आपण । काय कारण सांगतसे ॥२९॥
कृतयुगीं हिमनगबाळा । टाकोनि निघाला शिवभोळा । वियोगजन्य दुःख ज्वाळा । जाळील कळिकाळा वाटतसे ॥३०॥
पार्वती झाली उदास । सोडील सर्व विलास । दृढ धरिलें वैराग्यास । लिहिलें प्राक्तन काय हें ॥३१॥
पतीनें कां केला कोप । काय अन्य जन्मींचें पाप । उभें राहिलें आपेंआप । मज मायबाप कोण तारी ॥३२॥
काय मी चुकल्यें पतिव्रताधर्म । किंवा काही काढिलें वर्म । किंवा चुकल्यें स्वधर्म । अवघा अधर्म चालविला ॥३३॥
वचनाचा केला अनादर । ब्राह्मणा छळिलें निर्धार । घडला होता अनाचार । म्हणोन मजवर कोप केला ॥३४॥
काय भक्तांलागीं छळिलें । काय पूजेंते विध्वंसिलें । काय गंगेतें निंदिलें । नंदिसी ताडिलें दंडानें ॥३५॥
मुखानें नये रामनाम । अंगीं धडाडला काम । ईश्वरीं नाहीं ठेविलें प्रेम । म्हणोनी सुखधाम हरपलें ॥३६॥
नाहीं केली देव पूजा । उच्छेदिलें देवद्विजां । तेणें मनोभंग झाला माझा । म्हणोनी दुःख पावल्यें ॥३७॥
काय विधुची केली निंदा । पन्नगासीं भोगविली आपदा । चिताभस्म लेपन अंगी सदा । हंसल्ये कदा तयासीं ॥३८॥
स्मशानीं असे सदा वास । गुंडाळिलें व्याघ्रांबरास । जाळुनि टाकिलें मदनास । धरिलें वैराग्यास म्हणवुनी ॥३९॥
श्वशुरगृहासीं वास केला । तेव्हा मायबाप बोलिला । म्हणोनी चित्तीं क्रोध आला । जाऊनि लपला कपाटीं ॥४०॥
ऐसे वदोनि वारंवार । नेत्रीं वाहे दुःखनीर । अंतरामाजी न टिके धीर । न सुचे व्यवहार करावया ॥४१॥
आतां सेवावें अरण्य । किंवा करावें देहपतन । किंवा तपालागीं जाऊन । घालूनि आसन बसावें ॥४२॥
पवन आणि चंदन । झोंबे अंगीं अग्निसमान । विधु तापवी देहालागुन । चंड किरण माध्यान्हीचा ॥४३॥
वाटे मजला वैरी वसंत । सुमन सुवास उग्र भासत । कोकिळास्वर कर्णी झोंबत । कर्कश काकवत दुःख देती ॥४४॥
अग्नीमाजी होमावा काय । कोठें पाहूं पतिराय । काय घडला न कळे अन्याय । काय उपाय करावा ॥४५॥
धरणीवरी अंग टाकी । कोण युक्ती सांगेल सखी । कैशी धुंडूं चतुर्दशलोकीं । हंसती न कीं मजलागीं ॥४६॥
ऐसी वियोगदु:खें करून । पोळली अंतःकरणी जाण । वैराग्यसंपन्न तपालागून । गेली कानन सेवावया ॥४७॥
वल्कलें करूनि धारण । माथां जटा गुंडाळून । कुंकुम मळवट भरून । घालून आसनी बैसली ॥४८॥
कांहीं दिवस वायु भक्षण । कांहीं दिवस फळें सेवन । कांहीं दिवस पर्णे जाण । सेवन दुर्वांचें ॥४९॥
कांहीं दिवस जलपान । कांहीं दिवस कंदमूळ भक्षण । कांहीं दिवस निराहार राहून कांहीं सेवन करीना ॥५०॥
कांहीं काळ ऊर्ध्व बाहू करून । कांहीं दिवस पंचाग्निसाधन । कांहीं दिवस उभे राहून । नाहीं शयन बहुकाल ॥५१॥
ब्रह्मांडीं प्राण नेऊन । केलें हटयोगाचें साधन । आकर्षण करूनि मन । इंद्रिय दमन बहुकाळ ॥५२॥
राजयोग साधनीं । निमग्न राहे निशिदीनीं । रामनाममंत्रें करोनी । काल वनीं काढिला ॥५३॥
अष्टांगयोगाच्या साधनीं । देह झिजविला तपें करूनी । परी प्राणेश्चरालागूनी । दया मनीं नयेचि ॥५४॥
जो भक्तीचा भुकेला । भावें करोनी बांधला गेला । तो हिमनगजेलागीं दुरावला । म्हणोनी झाला खेद चित्तीं ॥५५॥
आतां काय करावा उपाय । कैसा भेटेल पतिराय । चिंता करोनि झिजली काय । झाली तन्मय वृति ती ॥५६॥
तपें करूनि देह तापला । तीन्ही लोकीं कंप सुटला । इंद्र मनामाजीं दचकला । काय वर्तला अनर्थ ॥५७॥
ऐसें तीव्र तप स्त्रीनें केलें । नाहीं कोठें आयकिलें । शंकरें दर्शन नाहीं दिलें । तरी खचिलें घाटे ब्रह्मांड ॥५८॥
तों पाहिला नारदमुनी । पुसती झाली तयालागुनी । पूजन केले स्वस्थमनीं । लागली चरणी तयाच्या॥५९॥
इतुकियामाजी देवऋषी । पुसता झाला पार्वतीसीं । तुझी दशा कां गे ऐसी । आलीस वनीं काय काजें ॥६०॥
शरीर झालें जर्जर सेविलें कानन कां कठोर । पंचवदनाचा पडिला विचार । सांगे उत्तर लवलाहीं ॥६१॥
मग बोले शैलबाला । मी कांहीं अपराध न केला । परी पतीचा वियोग झाला । उपाय मजला सांगे आतां ॥६२॥
दरिद्यासी लाभतां चिंतामणी । मग हर्ष न माय गगनीं । तैसें झालें माझे मनीं । तुज नयनी देखतांची ॥६३॥
बहुकाल सेविलें कानन । तप केलें अनुदिन । परी मजला स्वामी अजून । भेटूनि नयन निववीना ॥६४॥
आतां यत्‍न काय करूं । मज सांगा जी निर्धारूं ॥ कोण्या कर्में परात्परू । होईल साचारू प्राप्त मज ॥६५॥
ऐसें बोलतां जगज्जननी । सुचला विचार एक मनीं । म्हणे गणपतीच्या व्रते करूनी । पावेल सदनी शंकर ॥६६॥
ऐसे बोलतां देघर्षी । जगन्माता म्हणे सांग मजसीं । तो बोले मुनीं तियेसीं । गजाननासी पूजावें ॥६७॥
मग करुनी गणपती स्तवन । आणिलें मनामाजीं ध्यान । चतुर्भुज रक्तवर्ण । केलें चिंतन तयाचें ॥६८॥
विशाल दोंदाची शोभा । स्मरतां संकटासरसा उभा । मांड्या कर्दळीचा गाभा । नयन शोभा पद्मापरी ॥६९॥
माथां शेंदुर शोभत । रत्‍नजडित मुगुट झळकत । पायीं घागरिया घाजत । येत नाचत झडकरी ॥७०॥
मग देउनीं आलिंगन । संतोषविलें तयाचें मन । कां माते सेविले कानन । संकट कवण पडियेलें ॥७१॥
म्हणे मातें काय काजा । कवणें गांजिला देह तुझा । कां केलासी धावा माझा । सांगे हितगुजा मजपाशीं ॥७२॥
ऐसें ऐकोनी वचनातें । सांगे पार्वती तयातें । पतीनें त्यागिलें मातें । सेविलें विपिनातें तयालागीं ॥७३॥
बहुत केलें तपाचरण । न सरे माझें पाप अजुन । वियोग दुःखे सरुन । सुख संपादन न होय ॥७४॥
भेटी न होय माझी । म्हणोनी आस केली तुझी । आतां प्राणपती होय राजी । ऐसें आजी व्रत सांगे ॥७५॥
“माझें व्रत संपादन । करितां संकट जाय निरसुन । पूर्वी सांगितलें तिथिप्रमाण । मास पक्षजाण सत्य तोचि ॥७६॥
तया दिनी व्रतारंभ । करितां भेटेल तुज सांब । पूजाविधान हेरंब । करीं अंबे संतोषें ॥७७॥
प्रात:काळी दंतधावन । मग करुनि माझे स्मरण । संकल्पें मातें प्रार्थून । व्रतस्थ जाण असावें ॥७८॥
आजी चंद्रोदयपर्यंत । मी राहोनि उपोषित । पूजन करीन एकचित्त । भोजनी रत होईन पुढें ॥७९॥
ऐसी प्रार्थना करुन । आंगासीं काळे तीळ लावून । स्नान नित्यनेमें सारून । उपोषित राहे जाण मग ॥८०॥
मोदक करावे एकविंशती । पांच अर्पावे देवाप्रती । पांचांचे वायन ब्राह्मणाहातीं । सेवीं निश्र्चिती शेष आपण ॥८१॥
धातु, पाषाण, मृत्तिका जाण । तयाची प्रतिमा करून । गणपती नामें तयाचें स्थापन । करील पावन सकळातें ॥८२॥
मग करावें आवाहन । मनी आणोनि करावें ध्यान । षोडशोपचारें पूजन । सांग संपादन करावें॥८३॥
अथर्वशीर्षाचे पाठ । एकविंशति करावे नीट । अक्षर वटिका म्हणोनि स्पष्ट । करावा संतुष्ट गजानन॥८४॥
वस्त्र उपवस्त्रादि सकळ । चंदन, सिंदूर परिमळ । रुई-मांदार पुष्पें सकळ । दुर्वा कोमळ अर्पाव्या ॥८५॥
मज दुर्वाची अतिप्रीती । सहस्त्रनामें अर्पावे एकचित्तीं । जयाची असेल शुद्धमती ॥ तोचि भक्ती करी ऐशी ॥८६॥
धूप-दीप-नैवेद्य जाण । मोदकादि करूनि पक्कान्न । समर्पूनि, उत्तरापोशन । करूनि, अर्पावा तांबूल ॥८७॥
मग ठेवी दक्षिणा फळ । प्रदक्षिणा मंत्रपुष्प सकळ । चरणीं ठेवीं शिरकमळ । भावें केवळ प्रार्थावे ॥८८॥
चंद्रोदय झालियावरी । मग विधूची पूजा करी । अर्ध्य देउनी त्रिवारी । प्रार्थना करी विधूची ॥८९॥
मग पंचमोदक वायन । द्यावें ब्राह्मणालागून । दक्षिणा तांबूल समर्पून । करावें वंदन द्विजातें ॥९०॥
करूनि ब्राह्मण संतर्पण । पात्री बैसावें आपण ” । ऐसें सांगोनि विधान । गेला गजानन स्वस्थाना ॥९१॥
विनायकें सांगितलें मातेसी । कृष्णें विदित केलें पांडवांसी । स्कंदें सांगितलें ऋषीश्र्वरांसी । पावती कल्याणासी सकळिक ॥९२॥
पार्वतीनें केलें व्रतासीं । मनी धरोनी निश्र्चयासी । करितां पावली पतीसीं । स्कंदे ऋषीसीं सांगतसें ॥९३॥
पाहतां नयनीं पंचवदन । चरणी लागली जाऊन । शिवें गिरिजा उचलोन । वामांकीं बैसवून तोषविली ॥९४॥
ऐसें व्रताचें महिमान । जाणती पंडुनंदन । स्वयें हिमनगजा आपण । पावली समाधान पतिसंगें ॥९५॥
हें व्रत जे कोणी करिती । दरिद्र, शोक तयांचें जातीं । केलें कष्ट फळ देती । वैरी सोडिती वैरभाव ॥९६॥
विद्या प्राप्त होईल जाणा । पूर्ण होईल मनकामना । निपुत्रिक पावेल संताना । पीडितजना सुख होय ॥९७॥
धन धान्यवृद्धी अमूप । हरपोनी जाईल पापताप । करितां नाममंत्राचा जप । आपेंआप मोक्ष लाघेल ॥९८॥
जयाचा शास्त्रावरी विश्‍वास । तोचि होईल निर्दोष । शांती दयेनें भरेल मानस । क्षमा हृदयास उपजेल ॥९९॥
असो आतां हा पाल्हाळ । अंगी असावें भक्तीबळ । कृपा करील गिरिजाबाळ । श्रोतीं सकळ ऐकावें ॥१००॥

॥ श्रीसकलविघ्नहरणगजाननार्पणमस्तु ॥

संदर्भ :
सुर्यसिध्दान्तिय देशपांडे पंचांग
khapre.org ,
धर्मबोध : ले. ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

 

 

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published.